निवडणुकांचा मार्ग मोकळा
– जिल्हा परिषद निवडणुका उद्या किंवा परवा जाहिर होणार ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
दिल्ली ! पीपल बाईट
राज्यातील जिल्हा परिषदांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल लागल्याने आता निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या किंवा परवा कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की ज्या जिल्हा परिषदांच्या मतदारसंघांमध्ये आरक्षणाची तरतूद ५० टक्क्यांच्या मर्यादेत आहे, त्यांच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात. दरम्यान, ५० टक्क्यांच्या मर्यादा ओलांडणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका रद्द करण्यात येतील असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये नव्याने आरक्षण प्रक्रिया करावी लागणार असून प्रशासनावर अतिरिक्त कामाचा भार वाढणार आहे.या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला आता ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणानुसार स्थिती सुरळीत आहे, त्या जिल्ह्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात अडथळा उरणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजात निर्माण झालेला संभ्रम व अनिश्चितता कमी होऊन पुढील प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे. संभाव्य उमेदवारांनी हालचालींना वेग दिला असून, प्रमुख पक्षांनीही आपल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या दिशेने निर्णायक पाऊल मानला जात आहे. नगरपंचायती निवडणुका ठरलेल्या वेळेत होतील. तसेच पुढील सुनावणी ३१ जानेवारीला होणार आहे. ५७ नगरपरिषदेचे आरक्षण ५० टक्के पेक्षा अधिक असल्याने त्यांची सुनावणी पुढे होणार आहे. निवडूण आलेल्या उमेदवारांवर टांगती तलवार आहे.
————————-
बातमीसाठी संपर्क : ८३२९५२५६४३

