महाराष्ट्रराजकारण

मराठा आरक्षणावरून अजून वाद पेटणार! चंद्रकांत पाटीलांनी स्पष्टच सांगितल तर राणे म्हणाले- ‘ओबीसी नाही तर EWS…’

मराठा आरक्षणाच्या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील आणि नितेश राणे यांनी विरोध केला आहे. त्यांच्या मते, मराठा समाजाला ओबीसी श्रेणीत समाविष्ट करण्याऐवजी सध्याच्या ईडब्ल्यूएस (EWS) कोट्याचा लाभ द्या.

मुंबई: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणावर बसले आहेत. त्यांनी १ सप्टेंबरपासून पाणीही सोडण्याचा निर्णय घेतला होता, पंरतु, त्यांच्या या मागणीला मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विरोध केला आहे. त्यांच्या मते, मराठा समाजाला ओबीसी श्रेणीत समाविष्ट करण्याऐवजी सध्याच्या ईडब्ल्यूएस (EWS) कोट्याचा लाभ घ्यायला हवा. या कोट्यातील आरक्षणाचे प्रमाण वाढवण्यावरही सरकार विचार करू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसी नाही, तर EWS आरक्षण घ्या – राणे

मंत्री नितेश राणे यांनी मनोज जरांगे यांच्या ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या मागणीला विरोध केला. ते म्हणाले की, जर जरांगे यांनी आपली मागणी मराठवाड्यापुरती मर्यादित ठेवली, तर सरकार त्यावर विचार करू शकते. मात्र, ते पुढे म्हणाले की कोकणात मराठा आणि कुणबी यांची ओळख वेगळी आहे आणि ते सध्याच्या परिस्थितीत समाधानी आहेत. माझ्या आणि इतर भागातील मराठा समाजाचे लोक ओबीसीचा लाभ मिळवण्यासाठी कुणबी म्हणून ओळख स्वीकारायला तयार होणार नाहीत.

याऐवजी, राज्य सरकारने याआधीच एक कायदा केला आहे, ज्या अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला (EWS) शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण आणि इतर आर्थिक मदत दिली जाते. जर हे आरक्षण वाढवण्याची मागणी असेल, तर सरकारसोबत यावर चर्चा केली जाऊ शकते, असेही राणेंनी सांगितले.